
नांदेड – अग्निशमन विभागातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावतांना महापालिका हद्दीत व हद्दीच्या बाहेर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती घडलेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहून, स्वतः च्या जीवाची काळजी न करता नागरिकांच्या जीवाचे व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करतात, हे त्यांचे मोलाचे कार्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यापुढेही त्यांच्या हातून सदैव असेच कार्य घडत राहो अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे दिनांक १४ ते २० एप्रिल या कालावधीत “अग्निशमन सेवा सप्ताह” पाळण्यात येत आहे. १४ एप्रिल रोजी अग्निशमन विभागात झालेल्या या कार्यक्रमात महानगरपालिका, अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागामार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमारजी डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अग्निशमन विभागाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, नगररचनाकार महेंद्र पवार यांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या प्रसंगी हुतात्म्यांना आदरांजली अर्पित करुन अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन, मागील वर्षात घडलेल्या विविध २६८ आगीच्या घटना प्रसंगी व आजपर्यंतच्या केलेल्या जोखमीच्या कार्याची स्तुती करुन समाधान व्यक्त केले. यापुढेही आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे, असे आवाहन डोईफोडे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी प्रास्ताविकात अग्निशमन विभागांतर्गत सर्व साहित्यांची व कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी प्रकाश टाकला. नांदेड महानगरपालिका अग्निशमन सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कर्डिले यांनी “अग्निशमन सेवा बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टप्यामध्ये उपलब्ध करुन दिलेल्या निधी अंतर्गत एकूण ७ उच्च दर्जा व अत्याधुनिक क्षमतेचे वॉटर टेंडर खरेदी केले. यामुळे अग्निशमन सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत झाली. याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांचे महानगरपालिका प्रशासनातर्फे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी नांदेड महानगरपालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, पशु शल्यचिकित्सक डॉ. रईसोद्दीन, क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव, अग्निशमन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त विलास पांचाळ यांनी केले. आभार प्रदर्शन प्रभारी उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पेरकेवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मान्यवरांनी अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाकडे उपलब्ध असलेल्या सर्व साहित्यांची पाहणी केली. या साहित्यांच्या वापर व आवश्यकता याबाबत निलेश कांबळे यांनी माहिती सांगितली.
१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिंन या जहाजाचा स्फोट होवून लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करताना प्राणांची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात दिनांक १४ ते २० एप्रिल या कालावधीत “अग्निशमन सेवा सप्ताह” पाळण्यात येतो.
निबंध स्पर्धेत आराध्या भवरे मराठी माध्यमातून तर आवेशा आफिन उर्दू माध्यमातून प्रथम…महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून नांदेड मनपा शालेय स्तरावर ‘ आगीच्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धेत मनपा शाळेतील मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये प्रत्येकी मराठी आणि उर्दू माध्यमातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये मराठी माध्यमातील प्रथम पारितोषिक आराध्या काशिनाथ भवरे या विद्यार्थिनीने पटकावले तर आरोशी रमेश हनुमंते (व्दितीय) आणि राशी सिद्धार्थ लोणे या विद्यार्थिनीला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. व ऊर्दू माध्यमातून आवेशा आफीन मोहम्मद जाकीर बागवान त्याने प्रथम तर अदीबा फातेमा अब्दुल रऊफने द्वितीय क्रमांक मिळवला.फायजा तहरीन मोहम्मद जावीद या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. या या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देवून त्यांचा गौरव करण्यात आला.