राजकीय

भारतीय संविधान संपविण्याचे भाजप, आरएसएसकडून प्रयत्न – राहूल गांधी

महाराष्ट्रात सरकार आल्यास शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा, आरक्षणाची मर्यादाही ५० टक्क्यांवरून वाढवणार

नांदेड – भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही दाखवत असलेले हे संविधान रिकामे असल्याची टीका केली होती. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे संविधान वाचले असते तर त्यांनी अशी टीका कधीही केली नसती. भारतीय संविधान हे रिकामे नाही तर त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, बिरसा मुंडा, बसव अण्णा यांच्यासह भगवान बुद्धांचे विचार आहेत संविधानातील विचार हे हजारो वर्षांपूर्वीचे आहेत संविधानात देशाचा इतिहास आहे इतकेच नव्हे तर संविधान म्हणजे जनतेची आत्मा आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते विरोधी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. नांदेडमध्ये ते गुरुवारी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला, सचिन पायलट, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर शब्बीर आली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 ते म्हणाले, देशात सध्या संविधान वाचविण्याची लढाई सुरू आहे. एकीकडे इंडिया आघाडी तर दुसरीकडे आरएसएस, भाजपासह संघ विचारांचे पक्ष संविधानाला संपविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र हे आम्ही होऊ देणार नाही. काँग्रेस पक्ष संविधान वाचविण्यासाठी कार्य करत आहे. भारतीय संविधान संपविण्याची भाषा त्यांना उघडपणे बोलता येणार नाही. पण बंद दाराआड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्याचा प्रयत्न सुरूच आहे. ज्यावेळी ते पुढे येऊन संविधान संपविण्याची भाषा बोलतील त्यावेळी संपूर्ण देशातील जनता त्यांच्या विरोधात उभी राहील. त्यामुळे त्यांना संविधान संपविण्याचे काम लपूनच करावे लागत आहे. संविधानापूर्वी देशात काय होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संविधानामुळेच आज निवडणुका होत आहेत. सामान्य नागरिक, महिला, आदिवासींचे संरक्षण संविधानामुळेच होत आहे. संविधान रक्षणासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता सदैव पुढे असेल असा विश्वास संसदेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महाराष्ट्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा गांधी यांनी केली. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये दिले जातील, महिलांसाठी राज्यात मोफत बस प्रवास केला जाईल, जातीय जनगणनेचे काम पूर्ण केले जाईल, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपये भत्ता, राज्यात अडीच लाख शासकीय नोकऱ्या दिल्या जातील, शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा दूर केली जाईल असे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी दिले
केंद्र सरकार हे सामान्य नागरिकांसाठी काम करत नसून केवळ १५ ते २० बड्या उद्योगपतींसाठी काम करीत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. मुंबईतील धारावी झोपडपट्टी अडानीच्या घशात टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  यासाठीच महाराष्ट्रातील सरकार पाडले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकल्पातून अडाणींना एक लाख कोटी रुपयांचा नफा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या बैठकीत अडाणी यांची उपस्थिती होती, असेही ते म्हणाले.  देशात आज लघुउद्योग बंद पडले आहेत, जीएसटी योग्य पद्धतीने आकारली जात नाही, छोट्या छोट्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांना संपविण्याचे या सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ होते तर शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होत नाही असे ते म्हणाले. देशात निधीचे वाटप समान पद्धतीने होत नाही असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील कदम, भगवानराव आलेगावकर, आनंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शिवसेनेचे माधव पावडे, शाम दरक, सुरेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते तसेच मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत…महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात जर सरकार अस्तित्वात असते तर वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये का गेला.  टाटा एअरबस हवाई जहाज निर्मिती प्रकल्प ज्यातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती असा १ लाख १८ कोटींचा प्रकल्प, आयफोनचा दोन लाख कोटींचा प्रकल्प ज्यातून ७५ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार होता, त्याचवेळी बल्क ड्रग पार्क हा ३ हजार कोटी रुपयांचा ८० हजार जणांना रोजगार देणारा प्रकल्प, भेलचा पेट्रोलियम प्रकल्प ६० हजार कोटींची गुंतवणूक आणि २१ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला असता. असे सर्व प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत त्यावेळी महाराष्ट्र सरकार नेमकी काय करत होती असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. मुंबईतील धारावी आदानीच्या घशात घातली गेली आहे.  महाराष्ट्रातून प्रकल्प का पळविण्यात आले. आपल्यात काय कमी होती, आपण हे प्रकल्प राबवले नसते का असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!