महापालिका

नांदेडमध्ये गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिकेने उचलली ठोस पाऊले..

अमृत 2.0 अंतर्गत गोदावरी नदीत थेट मिसळणारे १३ नाले ३० मार्चपर्यंत अडविण्यात येणार, गोदावरी नदीकाठी टाकली जात आहे ४.२६ किलोमीटर अंतराची स्वतंत्र पाईपलाईन 

नांदेड – दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहराच्या मधोमध गोदावरी नदी वाहते. संपूर्ण भारतात ४० शहरातून मधोमध नदी वाहणाऱ्या भाग्यवान शहरांमध्ये नांदेडचा समावेश आहे. त्यामुळे आता गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी नांदेड महापालिकेने ठोस पाऊले उचलले आहेत. यावर्षी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. केवळ संकल्पच केला नाही तर त्या दृष्टीने महापालिकेची पाऊलेही पडली आहेत.  चुनाल नाला येथील मल:शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे.  बंदाघाटावरील नाल्यांचे पाणी आता शुद्ध करूनच गोदावरी नदीत सोडले जाणार आहे. त्याचवेळी मार्च अखेरपर्यंत शहरातील १३ नाले गोदावरी नदीत जाण्यापासून पूर्णतः रोखले जातील, असा विश्वास नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केला आहे.
गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी ३ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केली. गोदावरी नदीकाठी सुरू असलेल्या प्रत्यक्ष कामांची पाहणी करताना आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता सुमंत पाटील यांनी कामाच्या प्रगती बाबत माहिती दिली. नांदेड शहरात अमृत 2.0 अंतर्गत तब्बल ४२० किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचवेळी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गतच गोदावरी नदीकाठी पाईपलाईन टाकून गोदावरी नदीत थेट मिसळणारे १९ नाले रोखले जाणार आहेत. यासाठी गोदावरी नदीकाठी ४.२६ किमी अंतराची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील २ किमी अंतराचे काम पूर्ण झाले असून ८ चेंबरचे कामही संपले आहे. त्याचवेळी शहरातील १३ नाले ३० मार्चपर्यंत गोदावरी नदीत थेट मिसळण्यापासून रोखण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भाने संबंधित ठेकेदाराला महापालिकेने सूचनाही दिल्या आहेत. त्यादृष्टीने गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यापुढील १.२ किलोमीटरचे काम एप्रिल, मे पर्यंत शक्य होईल, असेही आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे.
आजघडीला डंकीन येथील एसटीपी अर्थात मल: शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे. ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प सुरू झाल्याने चुनाल नाला येथील पाणी शुद्ध करूनच आता गोदावरी नदीत सोडले जात आहे.  लवकरच बंदाघाटावरील भागातून वाहणारे सर्व नाले नदीत मिसळण्यापासून रोखण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील प्रदूषणाचे प्रमाण निश्चितच कमी होणार आहे. या प्रकल्पांतर्गत केवळ उत्तर नांदेडचे नालेच गोदावरी नदीत मिसळण्यापासून रोखले जाणार नाही तर दक्षिण नांदेडमधून गोदावरी नदीत मिसळणारे ५ नालेही थांबविण्यात येणार आहेत.  त्यामुळे  गोदावरी प्रदूषण मुक्त होईल, ही कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. यावर्षी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प नांदेड महापालिकेने केला आहे. तो निश्चितपणे एप्रिल- मे पर्यंत पूर्ण होईल असेही नियोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे म्हणाले.
अमृत 2.0 अंतर्गत शहरात ४२० किलोमीटर ड्रेनेज लाईन नव्याने टाकली जाणार आहे. त्याचवेळी एसटीपी बांधणे, एसपीएस, नवीन पंप खरेदी करणे, जे टी मशीन खरेदी करणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. अमृत 2.0 अंतर्गत नांदेड महापालिकेला ३२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, रवींद्र सरपाते, योजनेचे सल्लागार सुखदेव तुंवर, शारदा कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील कोरके आदी परिश्रम घेत आहेत.

गोदावरी शुद्धीकरणासाठी यापूर्वी झालेले प्रयत्न…नांदेड येथील गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या १३ कोटीच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करण्यात आले होते. नांदेड शहरातील १८ नाले गोदावरी नदीत मिसळू नये, यासाठी योजना हाती घेण्यात आली होती बोंढार येथे ११० एकर जागेवर मल:शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. गोदावरी नदीत मिसळणाऱ्या नाल्यांचे पाणी देगलूर नाका येथील पंपगृहात आणून ते बोंढार येथील केंद्रात पोहोचविणे अपेक्षित होते. २००८ मध्ये ही योजना पूर्ण झाली होती. २००८ ते २०१७ पर्यंत या योजनेकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर २०१७ मध्ये ५५ लाख रुपये खर्चून बंद पडलेली योजना कार्यानित करण्यात आली होती. मात्र पुढे हा प्रकल्प केवळ सहा महिने चालला. २०१९ मध्ये नांदेड महापालिकेने गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ७७ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यातून चुनाल नाला  येथे एक स्वतंत्र एसटीपी कार्यान्वित करण्यात आले आहे.  आता अमृत 2.0 अंतर्गत केंद्र शासनाने निधी दिला असून गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होण्याचे नांदेडकरांचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल अशीच चिन्ह आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!