
नांदेड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील शस्त्र परवान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातही शस्त्र परवानांचा आढावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. जिल्हा आजघडीला १ हजार १४५ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. या शस्त्र परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रियाही सध्या सुरू आहे.
जिल्ह्यात दरवर्षी शस्त्र परवान्यांची पडताळणी केली जाते. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात आली आहे, अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. परवानाधारकाने शस्त्रपरवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी शस्त्र परवान्यात नमूद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात करुन मुळ शस्त्र परवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करणे आवश्यक आहे.
बीड जिल्ह्यातील घटनेनंतर मराठवाड्यातील शस्त्र परवान्यांचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. संपूर्ण मराठवाड्यात ५ हजाराहून अधिक शस्त्र परवाने वितरित करण्यात आले आहेत. हे परवाने देताना नियमांचे पालन केले गेले नसल्याचा आरोप अनेक ठिकाणी होत आहे. पण त्याचवेळी या परवान्यांची दरवर्षी पडताळणी केली जाते.
नांदेड जिल्ह्यातील शस्त्र पडताळणी ही आता सध्या सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यात खेळाडू, संस्थात्मक परवाने आणि खासगी असे मिळून ९६२ परवाने आहेत. जिल्ह्यात शस्त्र परवाना संदर्भात तक्रारी प्राप्त नाहीत. अनुचित घटनांची या अनुषंगाने नोंद नाही. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती एकूणच शांततामय आणि कायदा सुव्यवस्था राखूनच आहे, ही बाबही जिल्हाधिकारी राऊत यांनी अधोरेखित केली. पण त्याच वेळी दरवर्षी शस्त्र परवानांची पडताळणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात आहेत १ हजार १४५ शस्त्र परवाने..!जिल्ह्यात तीन प्रकारचे शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. ज्यामध्ये खेळाडूंसाठीही परवाने देण्यात आले आहेत. हे खेळाडू स्पर्धात्मक तयारीसाठी या शस्त्रांचा वापर करतात. तर शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी १९९५ पूर्वी शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. अशा परवान्यांची संख्याही जिल्ह्यात आहे. त्याचवेळी बँक रिटेनर या अंतर्गतही सुरक्षा कारणांसाठी परवाने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात दरम्यानच्या काळात रिंधा नामक गुन्हेगाराच्या टोळीने जिल्ह्यातील अनेक व्यापारी, डॉक्टर राजकारणी यांना धमकावले होते. खंडणीचे अनेक प्रकारही पुढे आले होते या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने शस्त्र परवाने वितरित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ही शस्त्र परवान्यांची संख्या वाढली असल्याची बाबही पुढे आली आहे.