प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २ लाख ६८ हजार अर्ज मंजूर

नारी शक्ती दूत पोर्टलवर आतापर्यंत ४ लाख ७३ लाख अर्जांच्या नोंदी

नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दाखल ४ लाख ७३ हजार १२३ अर्जापैकी २ लाख ६८ हजार ९५५ अर्ज तालुका समितीने मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले आहेत. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या अर्ज ऑनलाईन करणे व मंजुरी देणे या कामात व्यस्त असून जिल्ह्यात आतापर्यंत ५६ टक्के अर्जाना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे.

दरमहा, दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये महिला भगिनींना थेट बँक खात्यात देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकीकडे अर्जदारांची लगबग सुरू असतानाच प्रशासन हे सर्व अर्ज नारी शक्ती दूत पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये व परिपूर्ण प्रस्तावाना मंजुरी देण्यात व्यस्त आहे. अर्ज अचूक अपलोड करण्यात यावे, याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्याची पुढे आलेली आकडेवारी पाहता दाखल केलेल्या अर्जांपैकी २ लाख ६८ हजार ९५५ अर्जांना तालुकास्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. पोर्टलवर अपलोड करताना त्रुटी आल्यामुळे नामंजूर झालेल्या अर्जांची संख्या फक्त ३७१ आहे. आता या अर्जांना जिल्हास्तरीय समिती तपासणी नंतर मान्यता देणार आहे.

या योजनेअंतर्गत ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज गोळा करण्यामध्ये व पोर्टलवर भरण्यामध्ये सर्वात प्रभावीपणे मुखेड तालुक्याने काम केले आहे. या तालुक्यात ऑफलाइन व ऑनलाईन एकूण ३४ हजार ५४४ अर्ज दाखल झाले. यापैकी ३४ हजार २०२ अर्ज अपलोड करून तालुका समितीने मान्य केले आहेत. ही टक्केवारी ९९ आहे. जिल्ह्याची सरासरी टक्केवारी ५६ असताना मुखेड तालुक्याने उत्कृष्ट काम केले केले आहे.

जिल्ह्यातील ज्या पात्र महिला या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतात त्या सर्व महिलांनी अर्ज दाखल करावे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असली तरी ही प्रक्रिया निरंतर सुरू असेल. तथापि, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे पैसे रक्षाबंधनला मिळणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने गतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज अपलोड करणे सुरू केले आहे.

सर्वाधिक अर्ज नांदेड तालुक्यात… जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज नांदेड तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. ही संख्या ७७ हजारावर आहे. तर सर्वात कमी अर्ज धर्माबाद तालुक्यामध्ये आहेत. ही संख्या केवळ १२ हजार आहे. दरम्यान, पात्र ठरलेले ५६ टक्के अर्ज प्राथमिक तपासणीनंतर तालुका स्तरीय समितीला योग्य वाटत असले तरी या संदर्भातील अंतीम निर्णय जिल्हास्तरीय समिती घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!