राजकीय

काँग्रेसचे संविधान प्रेम बेगडी – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

खोट्यांच्या माथी गोटा मारण्यासाठी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सज्ज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड – देशात काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी नेहमीच भारतीय संविधान संपविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आज काँग्रेसचे नेते संविधानाच्या नावे हातात एक लाल पुस्तिका घेऊन फिरत आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे एकही अक्षर नाही. त्यामुळे भारतीय संविधानाचे पावित्र्य काँग्रेस नष्ट करीत आहे. काँग्रेसचे हे संविधान प्रेम बेगडी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नांदेडमध्ये केली.

नांदेडमध्ये शनिवारी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातील उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये ३७० च्या आधारे देशात दोन संविधानाची अंमलबजावणी केली जात होती. ३७० कलम हटवून आम्ही संबंध भारतात एकाच संविधानाची अंमलबजावणी केली असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात ओबीसी, एससी, एसटी, आदिवासींना आपसात लढवून काँग्रेसने सत्ता उपभोगली आहे. पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधीपर्यंत काँग्रेसची हीच निती राहिली आहे. काँग्रेसचे शहजादेही आता हेच करीत आहेत. मात्र आता मी स्वतः ओबीसी पंतप्रधान झाल्याने विकासाचा नवा मार्ग देशाने पहिला आहे. यापुढील काळात आता ओबीसींसह इतर प्रवर्गातील लोकांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला.

महाराष्ट्रात उध्दव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचारांचा वारसा विसरून वेगळ्या वाटेला लागले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील जनता आता धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा मिळाल्यात. महाराष्ट्रातही याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीच आवश्यक असल्याची येथील जनतेला खात्री झाली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेडहून फुल आले नसल्याची खंत व्यक्त करीत आता नांदेडचे फुल सत्तेत पाठवा असे आवाहनही मोदी यांनी केले.

मराठवाड्यातील ११ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली असून या भागातील शेतकऱ्यांच्या हितालाच महायुती सरकारने प्राधान्य दिले आहे. महविकास आघाडी सरकारने बंद पाडलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील १ कोटी २५ लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यात एकट्या नांदेड जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत दीड हजार कोटी रुपये प्राप्त करून दिले असल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुती सरकारने मराठवाड्यात ४७ हजार कोटींच्या योजना सुरू केल्या असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधकांनी संविधान बदलणार असे फेक नरेटिव्ह पसरविले. मात्र आता खोट्यांच्या माथी गोटा मारण्यासाठी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, युवक सज्ज असल्याचे सांगितले. संविधान कुणीही बदलू शकणार नाही असे सांगताना आता झूठ की दुकान बंद करायची असल्याचे त्यांनी सांगितले.  महाविकास आघाडीच्या घोषणापत्रावरही त्यांनी टीका केली. लाडकी बहिण योजनेसाठी पैसा कुठून आणता असे म्हणणाऱ्यांनीच आता ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही कुठून पैसा आणणार असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारताना विरोधकांचे नाव आता पलटूराम ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, बालाजी कल्याणकर, डॉ. श्रीजया चव्हाण, आनंद बोंढारकर, बापूराव गजभारे, जितेश अंतापूरकर यांचेही समयोचीत भाषण झाली.

चिखलीकर म्हणाले, संतुकराव तुम्ही आजच निवडून आलात…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचेही भाषण झाले. यावेळी भाषणात सभेतील एकूण उत्साह आणि गर्दी पाहता चिखलीकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचे लक्ष वेधत संतुकराव, तुम्ही आजच निवडून आलात अशी टिप्पणी केली. यामुळे संतुकराव हंबर्डे हेही सुखावले. काँग्रेसची मंडळीही आता भाजपाचा उमेदवार निवडून येणार असा प्रचार करीत असल्याचे ते म्हणाले. संतुकराव हंबर्डे यांचे बंधू तथा काँग्रेसचे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मोहनराव हंबर्डे यांनी बोलण्याच्या ओघात भाजपा उमेदवार निवडून येईल, असे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य त्यांनी पुढे लगेच सुधारले. मात्र तेच वाक्य उचलत समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. तोच धागा पकडत चिखलीकर यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.जिल्ह्यातील एकूण राजकीय वातावरण आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार निश्चित करताना झालेले मंथन पाहता ही टिप्पणी नेमकी कोणत्या अर्थाने केली याबाबतही सभास्थळी चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी नांदेडचे फुल आले नाही ही खंतही चर्चेत होती. एकूणच शनिवारी झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा प्रचंड यशस्वी झाली. समर्थकांमधील हा उत्साह टिकवून ठेवण्यात भाजपाला कितपत यश येईल, हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!