
नांदेड – नांदेडमध्ये उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी ‘मौत का सौदागर’ चे स्वागत करणारे फलक लावावेत अशी टीका करताना इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून अनेक जीवघेण्या औषधींना पुन्हा एकदा बाजारात आणण्याचे काम भाजपने केले आहे. मोदी हे ‘मौत का सौदागर’ असल्याची जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये केली
आंबेडकर म्हणाले, अन्न व औषधी विभागाने अनेक औषधी कंपन्यांच्या औषधांवर देशात बंदी आणली होती. मात्र त्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून भाजपाला निधी दिला. तो निधी प्राप्त होतास ती बंदी घातलेली जीवघेणी औषधी पुन्हा बाजारात आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. या औषधी कंपन्यांची आणि औषधांची यादी लवकरच आपण जाहीर करू असेही बाळासाहेबांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही गुजरात प्रकरणात मोदींचा ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख केला होता. मात्र पुढे काँग्रेसने तो उल्लेख करणे सोडून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सध्या पुढे आलेल्या इलेक्ट्रॉल बाँड प्रकरणात भाजपाला घेरण्याची मोठी संधी काँग्रेसला आली होती. मात्र ती संधी काँग्रेसला साधता आली नाही. बोफोर्स प्रकरणात भाजपने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींची मोठ्या प्रमाणात बदनामी केली होती. ते प्रकरण पुढे सिद्ध झाले नाही. इथे तर पुरावे असतानाही काँग्रेस भाजपावर तुटून पडली नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात एसबीआय बँकेला संपूर्ण रोख्यांची माहिती देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कंपन्या कोणत्या हे पुढे आले आहे. राफेल प्रकरणात फ्रेंच न्यायालयाने लाच देणाऱ्या दोघांना शिक्षा सुनावली आहे. लाच देणाऱ्यांना फ्रान्समध्ये शिक्षा झाली आहे. मात्र हे लाच घेणारे भारतातील कोण होते हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणातही काँग्रेस योग्य प्रकारे भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करू शकली नाही असेही बाळासाहेबांनी सांगितले.
नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप करताना ही निवडणूक मतदार विरुद्ध मोदी अशीच होत आहे. यामध्ये वंचित आघाडी माध्यम झाले असून आता नागरिकांनी वंचितला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
संघ परिवार आणि आमचे खानदानी भांडण असल्याचे सांगत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या दोन वर्षात नरेंद्र मोदी हे संघ प्रमुख मोहन भागवतांना भेटायला गेले नाहीत. मोदी हे संघाचे पाय कापायला लागले आहेत. त्यामुळे संघाने आता आम्हाला मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या मदतीने आम्ही मोदीला घालवतो असा विश्वासही त्यांनी दिला.
सध्या मोदी गॅरंटीची भाषणे सुरू आहेत. पण जे आपल्या पत्नीला दिलेली गॅरंटी पाळू शकले नाहीत ते देशाला दिलेली गॅरंटी पाळतील काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जो माणूस संघटनेशी, कुटुंबाशी इमानदार राहिला नाही अशा लोकांपासून देशाने सावध राहिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठा तसेच ओबीसी समाजाने वंचितच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे आंबेडकर म्हणाले. ७० वर्षे महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता होती. मात्र ही सत्ता निजामी मराठ्यांची होती असेही ते म्हणाले. उपेक्षित मराठ्यांना, गरीब मराठ्यांना हे निजामी मराठे जवळ करत नाहीत. ज्यांनी ज्यांनी मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला त्यांनी वंचितच्या सोबत यावे, ओबीसींनीही वंचितच्या मागे रहावे. आगामी काळात आरक्षणाचा हा प्रश्न आम्हीच निकाली काढू असा विश्वासही ॲड. आंबेडकर यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, नांदेडचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, राजेश्वर पालमकर, भदंत पय्याबोधी, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे आदींची उपस्थिती होती.
नरेंद्र मोदींना हुकूमशहा व्हायचे आहे… भारताची घटना बदलणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना बदलू शकणार नाहीत हे ते सांगत असले तरीही नरेंद्र मोदी घटना बदलणार नाही हे मात्र ते स्पष्ट करत नाहीत. आगामी काळात भारतीय संविधानात बदल होईल. कारण मोदींना हुकूमशहा व्हायचे आहे, त्यामुळे अशा व्यक्तीवर कुणीही विश्वास ठेवू नये असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.