
नांदेड – महावितरणच्या नांदेड विभागीय मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या व्हीआयपी रोडवरील एका विद्युत डीपीला अतिउच्च दाबाने शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. मुख्य रस्त्यावरच हा डीपी जळत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांसह वाहनधारकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. या विद्युत डीपीचा स्फोट होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात होती; मात्र सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही. नागरिकांनी अग्निशमन दलास पाचारण करून ही आग आटोक्यात आणली.
मार्चमध्येच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. एसी, फॅनसह इतर वीज उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यात महावितरणकडून देखभालीवर केवळ कागदोपत्री खर्च करून करोडो रुपये हडपले जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. महावितरणचे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे विभागीय कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा येथे आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर व्हीआयपी या मुख्य रस्त्यावरील विद्युत डीपी जळत असताना महावितरणचे स्थानिक कर्मचारी उपस्थित होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती साधने नसल्यामुळे ते काहीही करू शकत नव्हते. तेही स्थानिक नागरिकांसह डीपी जळत असताना पाहत होते. या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली मात्र वरिष्ठांकडून किती प्रतिसाद मिळाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
या परिस्थितीत डीपीजवळ असलेल्या दुकान मालकांचा जीव मात्र खालीवर होत होता. त्याचवेळी काही घरेही या डीपीच्या बाजूला होती. त्यामुळे या रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत डीपीचा स्फोट होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र सुदैवाने असा प्रकार घडला नाही. नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीबाबत माहिती दिली त्यावेळी ही आग एका बंबाने विझविण्यात आली.
उन्हाळ्याचे आणखी महिने उरले आहेत. या परिस्थितीत विजेची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे नांदेड शहरासह जिल्हाभरातील विद्युत डीपींची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडेही महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी फोन उचलत नाहीत तर अधिकारीही नागरिकांच्या फोनला प्रतिसाद देत नाहीत असेच चित्र आहे. आगामी काळातील काही दिवस वादळी वाऱ्याचा इशारा देणारे आहेत. त्यामुळे या काळातही आता नागरिकांना वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याकडे महावितरणने वेळीच लक्ष दिल्यास काही अंशी का होईना शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.