
नांदेड – नांदेडमधील कृषी महाविद्यालयाची रेडिमेड फाईल ही विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांनी उचलून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेऊन सही आणली. पुढे हे कृषी महाविद्यालय मीच आणले..मीच आणले… मीच आणले असे ते सांगायला लागले. प्रत्यक्षात नांदेडच्या कृषी महाविद्यालयाची संपूर्ण प्रक्रिया तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात आपण पूर्ण केली होती. विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर अर्थ विभागाने या कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीला अडथळा आणला होता मात्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून हा विषय मंत्रिमंडळात ठेवला. तो तत्वतः मान्य ही करण्यात आला; मात्र पुढच्या बैठकीपर्यंत आमचे सरकार गेले होते आणि हीच फाईल आमदार कल्याणकर यांनी शिंदेंकडे नेली. ते या कामात भाग्यवान ठरले अशी कोपरखळी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी रविवारी नांदेडमध्ये लगावली.
विधान परिषदेचे नूतन सभापती प्रा. राम शिंदे यांचा रविवारी नांदेडमध्ये मातोश्री मंगल कार्यालयात धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानी खासदार अशोकराव चव्हाण हे होते. आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार ॲड. श्रीजया चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्यासह धनगर समाजातील विविध नेते मंडळींची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार कल्याणकर यांनी आमदारकीची ही आपली दुसरी टर्म असल्याचे सांगितले. नांदेडमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आपल्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्याचा पाठपुरावा करत तो प्रश्न मार्गी लावल्याचे सांगितले. हाच धागा पकडत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आ. कल्याणकर यांना उघडे पाडले. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारणीसाठी नांदेडच्या सर्व आमदारांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आणि तो मार्गी लागला. या विषयात आमचाही खारीचा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र पुतळ्याचा तो प्रश्न आपणच मार्गी लावला, असा सूर आमदार कल्याणकर यांनी आळवला. असेच आणखी एक उदाहरण असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगताना नांदेडच्या कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीचा उलगडा केला. कृषी महाविद्यालयासाठी आपणही प्रयत्नशील होतो. यासाठी प्रारंभी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला होता. पुढे राज्याच्या सचिवांनी हा विषय अर्थ विभागाने जवळपास नामंजूर केला असल्याचे सांगितले होते. मात्र आपण स्वतः सदर विषयाची संचिका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढे ठेवली. कारण अर्थ विभाग एखाद्या विषयावर चर्चा करू शकते मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेऊ शकतात, हे आपल्याला माहिती होते. त्यामुळे आपण ठाकरे यांच्याशी चर्चा करून या विषयाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मंत्रिमंडळापुढेही हा विषय ठेवण्यात आला होता. तत्वत: तो मंजूरही झाला मात्र पुढच्या बैठकीपर्यंत आमचे सरकार गेले. पुढे आमदार कल्याणकर यांनी तीच रेडिमेड फाईल उचलून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे ठेवली आणि सही घेतली. रेडीमेड फाईल मिळवण्यात ते भाग्यवान ठरले असेही ते म्हणाले. नांदेडच्या विकासासाठी आपण कधीही अडथळा आणला नाही आणणारही नाही हे त्यांनी स्पष्ट केले. विकासाच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रातील नेते एकत्र येतात. एरव्ही भांडणारे नेते विकासाचे काम आले की ते मिळून आपल्या जिल्ह्यासाठी ओढून घेतात मराठवाड्यात मात्र चित्र उलटे असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे मराठवाड्याच्या नेत्यांनीही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा आदर्श घ्यावा असेही ते म्हणाले.
गोदावरी नदीवरील अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे – पोकर्णांची मागणी पश्चिम वळण रस्त्यावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली. त्यावेळी सभापती राम शिंदे यांनी आपण खालून प्रस्ताव पाठवावा, तो मंजूर करण्याची जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी नांदेड येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या कामाबाबतही महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. हा प्रश्न अहिल्याबाईंच्या ३०१ व्या जयंतीपर्यंत निश्चितपणे मार्गी लागलेला असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.