Police

नांदेड परिक्षेत्रात एकाच वेळी पोलीस ठाण्यांसह कार्यालयांची स्वच्छता 

९१ पोलीस ठाणे, २६ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, ५ अपर पोलीस अधीक्षक कार्यालये  आणि ४ पोलीस अधीक्षक कार्यालयांत साफसफाई

नांदेड- पोलीस परिक्षेत्रात रविवारी शासकीय सुट्टीचे दिवशी परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात सर्व‌ ९१ पोलीस ठाणे, २६ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, ५ अपर पोलीस अधीक्षक कार्यालये  आणि ४ पोलीस अधीक्षक कार्यालयांत एकाच वेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत कार्यालयांची साफसफाई केली.या मोहिमेत स्वतः नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सहभाग घेतला होता.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय कार्यालयांसाठी कामकाज व परिसर सुधारण्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा ठरवून दिला आहे.  १५ एप्रिल रोजी निश्चित केलेली १०० दिवसांची मुदत पूर्ण होत आहे. सदर उपक्रमाचा एक भाग म्हणून काल रविवारी नांदेड पोलीस  परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात सर्व‌ ९१पोलीस ठाणे, २६ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, ५ अपर पोलीस अधीक्षक कार्यालये  आणि ४ पोलीस अधीक्षक कार्यालयांत एकाच वेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी स्वच्छता  केली. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत, पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्ष पडून असलेली जुनी वाहने व इतर मुद्देमाल बऱ्याच अंशी कमी करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे, पोलीस ठाणे व पोलिसांच्या इतर कार्यालयांत अनेक वर्ष पडून असलेले जुने अभिलेखदेखील नष्ट करण्यात आले आहेत. या कामकाजा सोबतच जतन करून ठेवावयाचे अभिलेख प्रत्येक पोलीस ठाणे व कार्यालयांत सुव्यवस्थितपणे लावण्यात आले असून कार्यालयांच्या इमारती व इमारतींच्या बाहेरील परिसराच्या सुशोभीकरणावरही अनेक अधिकाऱ्यांनी भर दिला आहे.

पोलीस ठाण्यात व इतर कार्यालयांत अनेक वर्ष पडून राहिलेले जुने अभिलेख, कालबाह्य फर्निचर व मुद्देमालातील वाहने कमी झाल्याने, पोलीस ठाणे व कार्यालय परिसरातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कार्यक्षमतेवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील व पोलीस हे नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिक सकारात्मक मानसिकतेने पुढे येतील, अशी अपेक्षा पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!