
नांदेड – नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात आज घडीला मृत जलसाठ्यासह केवळ १९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यात जिवंत जलसाठा केवळ १६ दलघमी उरला आहे. हा जलसाठा केवळ ४० दिवस म्हणजेच २० जूनपर्यंत शहराला पुरेसा ठरेल, अशी अपेक्षा केली जात आहे. त्याचवेळी उत्तर नांदेडसाठी मात्र समाधानाची बातमी पुढे आली आहे. इसापूर धरणातून दोन दलघमी पाणी आसना नदीत शनिवारी पहाटे पोहोचले आहे. त्यामुळे उत्तर नांदेडच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नांदेडसाठी आणखी दोन दलघमी पाणी ईसापूर धरणात राखीव आहे. ही बाबही आणखी दिलासा देणारी आहे.
नांदेड शहरासाठी विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी घेतले जाते. वाढत्या तापमानामुळे आणि पाणी उचलल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून दररोज ०.४ दलघमी जलसाठा कमी होत आहे. उपलब्ध जलसाठा पाहता तो केवळ ४० दिवसांचाच शिल्लक आहे. २० जूनपर्यंत हा जलसाठा पुरेसा ठरणार आहे. त्यानंतर मात्र नांदेडकरांना इतर प्रकल्पातून पाणी घ्यावे लागणार आहे. गोदावरी नदीवार असलेल्या अंतेश्वर तसेच परभणी जिल्ह्यातील दिग्रस धरणातून नांदेडला पिण्यासाठी पाणी घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे. दिग्रसमध्ये प्रकल्पामध्ये नांदेडसाठी पाणी राखीव असल्याची माहितीही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी दिली.
दुसरीकडे नांदेडसाठी असलेली पर्यायी पाणीपुरवठा योजना आसना नदीवरून कार्यान्वित करण्यात आली आहे. आसना नदीचे पाणी काबरानगर येथे घेऊन शुद्धीकरण केले जाते. ते पाणी उत्तर नांदेडला पुरवण्यात येते. आसना नदीत यापूर्वी ईसापूर धरणातून दोन दलघमी पाणी घेण्यात आले होते. आता आज १७ मे रोजी ईसापूर धरणातून सोडण्यात आलेले आणखी दोन दलघमी पाणी आसना नदीत पोहोचले आहे. त्यामुळे उत्तर नांदेडचा पाणी प्रश्न निश्चितपणे सुटला आहे.
दक्षिण नांदेडसाठी मात्र चिंताजनक परिस्थिती आहे. नांदेडकरांना आता पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. सध्या अवकाळी पाऊस जोरात होत असला तरी आगामी काळात मान्सूनचा पाऊस लांबल्यास नांदेडकरांची पाण्याची चिंता वाढणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेने नांदेडकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी नांदेडकरांसाठी गोदावरी नदीवरील इतर प्रकल्पातून पाणी घेण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहेत. ऐनवेळी नांदेडकरांना धावपळ करावी लागू नये यासाठी निश्चितपणे महापालिका नियोजन करत असल्याचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी सांगितले. एकूणच परिस्थिती पाहता नांदेडकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे हे निश्चित…