
नांदेड – महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शंखनाद नांदेडमधून २६ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा मोंढा मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याने पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रतिउत्तराचाही हा शंखनाद असणार असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी स्पष्ट केले.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा २६ मे रोजी दुपारी २ वाजता नवा मोंढा येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ या भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत., यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.डॉ. भागवत कराड, पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह अनेक आमदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातील पावसाचे वातावरण लक्षात घेता या सभेसाठी विशाल वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. वेळेवर पाऊस आला तरीही सुरळीतपणे मोठी सभा होईल, असा विश्वास व्यक्त करून खा. चव्हाण यांनी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
२६ मे रोजी साधारणतः दुपारी १.१५ वाजता नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता वसंतराव नाईक चौक, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. हा पुतळा नांदेड-वाघाळा शहर महानगर पालिकेने उभारला आहे. दुपारी १.४५ वाजता भाग्यनगर रोड, विद्युत नगर चौक येथे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता नाना-नानी पार्क समोर उभारण्यात आलेल्या भाजप महानगर कार्यालयाचे उद्घाटन अमित शहा व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याच रात्री केंद्रीय गृहमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती खा. चव्हाण यांनी दिली. पत्रकार परिषदेला खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, दक्षिण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, विजय गंभीरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे संचालन जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.
सैन्य गौरव, खंबीर नेतृत्व, विकसित भारत आणि भाजपच्या निवडणूक सज्जतेचा ‘शंखनाद’! नवा मोंढा येथील सभेतून ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत शेकडो दहशतवादी व त्यांच्या तळांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या गौरवाचा शंखनाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवरच्या ११ वर्षांच्या वाटचालीत २०४७ मधील विकसित भारताची भक्कम पायाभरणी केल्याचा शंखनाद, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या खंबीर नेतृत्वाखाली नक्षलवाद निर्मूलनाबाबत कटिबद्धतेचा शंखनाद आणि महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सज्जतेचा शंखनाद होणार असल्याने या सभेला ‘शंखनाद’ हे नाव देण्यात आल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.