हवामान

विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले, एसडीआरएफच्या दोन्ही तुकड्यांना पुन्हा पाचारण

जिल्ह्यात अतिवृष्टी: १२ जनावरे दगावली, २१ घरांची अंशतः पडझड, पाऊस थांबताच सुरू होणार पंचनामे

नांदेड : जिल्हयातील प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत असून नदी, धरणे व बंधाऱ्यांपुढील नदीपात्रानजीक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्याचे तीन दारे उघडण्यात आली आहे. अंतेश्वर बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहेत. पूर्णा नदीवरील सिध्देश्वर धरणाची दारे उघडली आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू असून प्रकल्पाचा पाचवा दरवाजा रात्री ८.४० वाजता उघडण्यात आला आहे. प्रकल्पातून ६४ हजार ६२४ क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडले जात आहे. विष्णूपुरी प्रकल्पाखालच्या आमदुरा धरणाचे १६ पैकी ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्या खालील बळेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे.

ईसापूर धरणाच्या खालील बाजूस अतिवृष्टी होऊन पैनगंगा नदीपात्रात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा सध्या कमी झाला आहे. त्यामुळे धरणाखालील पूरस्थिती नियंत्रित करणे शक्य व्हावे याकरीता सायंकाळी ६ वाजता ईसापूर धरणातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

धरणामध्ये असणारा सध्याचा साठा, धरणामध्ये येणारा पाण्याचा नवीन प्रवाह, या महिन्यात धरणामध्ये ठेवायचा जलसाठा हे लक्षात घेऊन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिक, अतिवृष्टी झाल्यास अधिक प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्व नद्या तुडुंब वाहत असून नागरिकांनी आवश्यकता नसेल तर पुलावरून पाणी असल्यास पूल ओलांडू नये असे, आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचेच्या पंचनामे पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार व आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सहा मोठी दुधाळ जनावरे, पाच छोटी दुधाळ जनावरे एक बैल मृत्युमुखी पडले आहेत तर २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

जायकवाडी धरणही भरले..!                             गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणही जवळपास भरले आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी या धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास मात्र पुराचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

एसडीआरएफच्या दोन तुकड्या अर्ध्या रस्त्यातून परतल्या…जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी एसडीआरएफच्या दोन तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पूरपरिस्थिती ऑगस्टनंतर उद्भवणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून या तुकड्यांची मुदत ३१ ऑगस्टपर्यंतच होती. मात्र १ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यात पूर परिस्थितीचा बाका प्रसंग उद्भवला. त्यामुळे परतीच्या वाटेला लागलेल्या एसडीआरएफच्या दोन्ही तुकड्यांना अर्ध्या रस्त्यातून परत जिल्ह्यात बोलवून घ्यावे लागले. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. एसडीआरएफचे पथकही आता तैनात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलावर अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!