
नांदेड- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया जिल्हाभरात सुरू आहे. याअंतर्गत आता उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस उरले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. निवडणुका शांततेत आणि भयमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज आहेच. त्यासोबतच बीएसएफ आणि सीआरएफच्या १२ तुकड्याही जिल्ह्यात तैनात राहणार आहेत, यातील चार तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.
नांदेड जिल्ह्याला जोडणार्या तेलंगणा आणि कर्नाटक या राज्याच्या सिमा मार्गावर १७ ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक विधानसभा निहाय ३ एफएसटी पथक, ३२ एसएसटी पथक असणार आहेत. २७ व्हिडीओ पथक यांच्या माध्यमातून सभा, बैठका यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहेत. निवडणूक काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज असून सीआरपीएफ व बीएसएफच्या तब्बल १२ तुकड्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यापैकी चार तुकड्या नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत. उर्वरीत आठ तुकड्याही लवकरच दाखल होतील. त्यामुळे कुणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अबिनाश कुमार यांनी दिला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार इमारतींमध्ये एकूण ३ हजार ८८ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. मतदानाशिवाय मतमोजणी केंद्रावरही कडक बंदोबस्त राहणार आहे. मतमोजणी केंद्रांवरील बंदोबस्ताचा स्वतंत्र आराखडा तयार केला जात आहे.
जिल्ह्यात निवडणूक रणधुमाळीला आता वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अडसर आणणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ हजार आरोपींविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १०० जणांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निवडणूक काळात परवानाधारक शस्त्र जमा करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत १ हजार २०० पैकी ९०० हून अधिक शस्त्र जमा करण्यात आले आहेत.
अवैद्य धंद्याच्या विरोधातही पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मास रेड व कोम्बिंग ऑपरेशनही राबविले जात आहेत. पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. पोलिसांसाठी बारकोडींगही राबविले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक शांततेत पार पडेल, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार म्हणाले.