
नांदेड : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. २० ते २२ सप्टेंबर दरम्यान ही विशेष रेल्वे नांदेडहून निघण्याची शक्यता आहे. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर येथील सुवर्णमंदिर दर्शनासाठीही भाविकांना नेण्याची तयारी केली जात आहे. यासाठी गुरुद्वारा बोर्डाचीही मदत घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ६० वर्षावरील नागरिकांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे अर्ज दाखल करायचे आहेत. ३० हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपेको एका स्थळाच्या यात्रकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार इतकी राहील, यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित. कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ. भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किवा सेवानिवत्तांनंतर निवृनीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत, तथापि २.५० लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. अडीच लाखावरील उत्पन्न असणारे, गंभीर आजाराने ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेत जिल्ह्यात ३० हजार अर्ज…जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गतही अर्ज स्वीकारले जात आहेत. आतापर्यंत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयापर्यंत आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी ज्येष्ठांनी तत्काळ अर्ज करावेत असे सहाय्यक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी केले आहे.