शेती

नांदेड जिल्ह्यात पेरण्या सुरू होण्यापूर्वीच बियाणे, रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा..!

महिको सीड्सच्या बाऊन्सर, अजितच्या ५ व १५५ कापूस बियाणांची साठेबाजी सुरू, डीएपी युरिया खताचीही कमतरता तर दुसरीकडे बीजी 4 चा मोठा अवैध साठा महाराष्ट्रासह नांदेडमध्येही दाखल

नांदेड – मे महिन्यात यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे आणि मान्सूनच्या लवकर होणाऱ्या आगमनामुळे बळीराजा आता आपल्या खरीप हंगामासाठी बी- बियाणांची तजवीज करण्यासाठी सरसावला आहे. खरीप हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी आता बियाणे खरेदीसाठी बाजारात हळूहळू येत आहेत, बियाणे, खतांची विचारपूस करत आहेत; मात्र शेतकरी येत असताना बाजारातून कपाशीचे महिको सीड्स कंपनीचे बाऊन्सर, अजितचे ५ आणि १५५ असे नामांकित बियाणे बाजारातून पेरण्या सुरू होण्यापूर्वीच गायब झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कंपनीच्या बियाणांचा आग्रह व्यापाऱ्याकडून धरला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे मात्र उपलब्ध होत नसल्याने बियाणांची साठेबाजी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

नांदेड जिल्ह्यात कापसाचे मोठे पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीननंतर जिल्ह्यात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी आता मशागतीनंतर खरीप पेरणीच्या तयारीकडे वळला आहे. बी बियाणांच्या खरेदीसह खताची ही विचारपूस शेतकऱ्यांकडून केली जात आहे हे प्रमाण अद्याप वाढले नसले तरीही जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून होणाऱ्या बी बियाणांचा मात्र कृत्रिम तुटवडा आतापासूनच निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा खरीप हंगामात कपाशीच्या बाऊन्सरसह अजितच्या १५५ आणि ५ या बियाणांची मागणी होत आहे. हे दोन्हीही कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत माफदा महाराष्ट्र असोसिएशनचे राज्य सचिव बिपिन कासलीवाल यांनी सांगितले, जिल्ह्यात बाउन्सर आणि अजित बियाणांचा कमी पुरवठा झाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात केली असती तरीही केवळ दहा ते पंधरा टक्केच बियाणे उपलब्ध झाले आहे. या संदर्भाने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक तसेच पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यासाठी जादा बियाणांची मागणी करणारे पत्र दिल्यास पुरवठा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी इतर बियाणांची खरेदी करावी हे बियाणेही चांगला प्रतीचे असल्याचे ते म्हणाले.

बियाणांसोबत जिल्ह्यात डीएपी, युरिया या खतांची कमतरता आहे. जिल्ह्यात मागणीप्रमाणे खते उपलब्ध झाली नाहीत. पण त्याचवेळी १०:१०:२६, १२:३२:१६, सुपर फॉस्फेट, पोटॅश आडी खते उपलब्ध आहेत. ही खते शेतकरी आपल्या पिकांसाठी निश्चितपणे वापरू शकतात खतांची ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात बफर स्टॉक उघडावा अशी मागणीही कासलीवाल यांनी केली आहे. बफर स्टॉक खुला केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

बीजी 4 चा गुजरातहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध साठा …नांदेड जिल्ह्यात बीजी 4 या बियाणांची झिरोमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. गुजरातहून बीजी 4 बियाणांचा मोठ्या प्रमाणात नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अवैधरित्या साठा झाला आहे. या बियाणांची झिरोमध्ये विक्री होत आहे. कोणतीही पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यातून भविष्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृषी विभागाने हिमायतनगर येथे अशा अवैध विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली होती. मात्र पुढे अशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा कृषी विभागाने भरारी पथके नेमले असले तरीही या पथकांची कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!